बलूच आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला; १४ ठार   

इस्लामाबाद : पहलगाम हल्ल्याचा भारताकडून बदला घेतला जात असतानाच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानात दोन हल्ले केले. या   हल्ल्यांमध्ये १४ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. यामुळे पाकिस्तानातील अंतर्गत वाद पुन्हा वाढला आहे. 
 
बीएलएचे प्रवक्ते झियांद बलोच यांच्या म्हणण्यानुसार, पहिला हल्ला बोलानच्या माचकुंड भागातील शोरकंद भागात करण्यात आला. तिथे पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर रिमोट कंट्रोलने बॉम्बस्फोट घडविण्यात आला. या ह्ल्ल्यात १२ सैनिक ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे स्पेशल ऑपरेशन्स कमांडर तारिक इम्रान आणि सुभेदार उमर फारूख यांचा समावेश होता. पाकिस्तानी सैन्य भारताविरोधात कारवाईची तयारी करत असतानाच हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची चित्रफित आता समाजमाध्यमावर प्रसारीत झाली आहे. त्यामध्ये असे दिसते की, स्फोटानंतर वाहनात बसलेले सैनिक हवेत उंच उडाले आणि त्यांच्या चिंधड्या-चिंधड्या उडाल्या.
 
दुसरा हल्ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केच जिल्ह्यातील कुलाग तिग्रान भागात केला. यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या बॉम्ब निकामी पथकाला बॉम्ब हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात आणखी दोन सैनिक ठार झाले.
 
दरम्यान, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने आपल्या निवेदनात पाकिस्तानी सैन्याचे वर्णन भाडोत्री सैन्य असे केले आहे. ही सेना कधी बंदरांचे रक्षण करते, कधी कॉरिडॉरचे तर कधी परदेशी कर्जदारांची सेवा करण्यात गुंतलेली असते. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानला इशारा दिला आहे की, असे हल्ले अधिक वेगाने आणि तीव्रतेने सुरू राहतील.
 

Related Articles